भारताला हॉकीत कांस्य; तब्बल ४१ वर्षांनी पुरुष हॉकी संघाला पदकप्राप्ती
टोक्यो (वृत्तसंस्था) : भारताच्या पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा विजय मिळवत कांस्यपदक पटकावले. तब्बल ४१ वर्षांनी भारताला पदकप्राप्ती झाली. त्यामुळे यंदाचे पदक ऐतिहासिक ठरले आहे. ऑलिम्पिकमधील भारताचे हे एकूण १२वे तसेच १९८० मॉस्को ऑलिम्पिकनंतरचे पहिले पदक आहे.
आजवर ८ सुवर्ण, एक रौप्य तसेच तीन कांस्य अशी डझनभर पदके भारताच्या खात्यात आहेत. ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये जगात सर्वाधिक पदके भारताने जिंकली आहेत. पदक विजेत्यांवर संपूर्ण देशातून अभिनंदनाचा, कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचे फोन करून कौतुक केले. हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक रिड याच्याशी संवाद साधला.
पदक कोरोना योद्ध्यांना समर्पित : मनप्रीत सिंग
‘टोक्यो ऑलिम्पिकमधील पदक देशातील सर्व कोरोना योद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी आहे,’ अशी भावना कर्णधार मनप्रीतने सामना संपल्यानंतर व्यक्त केली.