मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर राज्य सरकारने मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी असून, लाखो लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात. लोकल सेवा सुरु करतानाच राज्य सरकारने वेळेचे बंधन घातले आहे, त्यावरुन विरोधी पक्षात असलेला भाजपा आक्रमक झाला आहे. राज्य सरकारचा लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय केवळ धूळफेक आहे. सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत लोकलची खरी आवश्यकता असताना, केवळ रात्री व दुपारी १२ ते ४ पर्यंत प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत हास्यास्पद व निरर्थक असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कोरोनामुळे लोकल बंद करून आज १० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. एकीकडे सर्वसामान्यांसाठी लोकल पुन्हा सुरू केल्यास कोरोना वाढेल असे कारण देणा-या ठाकरे सरकारने दुसरीकडे मात्र मद्यविक्रीची दुकाने, बार, रेस्टॉरंट, मॉल्स, बाजारपेठा, बसेस, शाळा-कॉलेज, लग्न समारंभ, राजकीय पक्षाच्या सभा आदी सर्व सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईतील उपनगरे व शेजारील शहरांमध्ये राहणा-या चाकरमान्यांना रस्त्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, त्यातही पूर्व व पश्चिम महामार्गावर होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी लोकल पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी अपेक्षा होती. परंतु कायमच आपल्या दिशाहीन निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या या सरकारने पुन्हा एकदा मुंबईतील सर्वसामान्य चाकरमान्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्याचेच काम केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, राज्य सरकारने अहंकार बाजूला ठेऊन सर्वसामान्यांसाठी तात्काळ लोकल सुरु करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षातर्फे मोठे जनआंदोलन केले जाईल, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.