मुंबई : अनेक महिन्यांपासून लोकल सेवेअभावी हेळसांड होत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यानुसार आता सर्व प्रवाशांना सकाळी ७ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.

मुंबईकरांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण

लोकल ट्रेनने 1 फेब्रुवारीपासून प्रवास करता येणार की, नाही असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. मुंबई लोकल 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारतर्फे आज सांगितले. यासंदर्भातील एक पत्र मध्य व पश्चिम रेल्वेला देण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारने दिलेले पत्र आम्हाला मिळाले आहे. त्यानुसार सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या सरकारच्या मागणीबाबत रेल्वे बोर्डाला कळवण्यात येईल. बोर्डाने मान्यता दिल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेनंतर मुंबईकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सामान्य नागरिकांची हेळसांड

विशिष्ट वेळा निर्धारित करून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. करोनामुळे मुंबईतील लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. हळूहळू लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मूभा देण्यात आली नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिकांची हेळसांड होत होती. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेळेच्या काही नियमांसह सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील, याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी मुंबईतील लोकल सेवा मर्यादित वेळेत उपलब्ध असणार आहे. यानुसार आता सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याचे आवाहन

दरम्यान, सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांमध्ये आवश्यक तो बदल करावा अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. मुख्य सचिवांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात कार्यालयीन वेळा बदलण्यासंदर्भात आवाहन करण्यात आलेलं आहे. या बाबतीतली सूचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे.

उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा

मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचा-यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.